भोपाळ: मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या भाजपच्या उमेदवार व मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. मी बाबरी मशिदीवर चढून पाडकाम केले, असे वक्तव्य करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रज्ञासिंह यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठविली आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमधील एका प्रचारयात्रेदरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आम्ही बाबरी मशीद उदध्वस्त करण्यासाठी गेलो होतो. मी स्वत: मशिदीवर चढून मशीद तोडली होती. ईश्वानेच मला ही संधी दिली, शक्ती दिली आणि मी हे काम केले, याचा मला गर्व आहे. आता आम्ही तिथेच राम मंदिर बनवणार, ते एक भव्य असे मंदिर असेल, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावर निवडणूक आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रज्ञासिंह यांना नोटीस पाठविली आहे.
तसेच मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. एल. कांताराव यांनी सर्व राजकीय पक्षांना यापुढे अशी वक्तव्ये केल्यास कडक कारवाई करण्याची तंबी दिली आहे. प्रज्ञासिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना शाप दिल्याने त्यांचा मृत्यू झाला व 21 दिवसांत सुतक संपल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर टीकेची झोड उठली होती. यावर प्रज्ञासिंह यांनी अटी-शर्तींवर हे वक्तव्य मागे घेतल्याचे जाहीर केले होते. भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्विजयसिंह यांच्या विरोधात भाजपने कडवा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेने साध्वी प्रज्ञासिंहच्या उमेदवारीचे समर्थन केले होते. आता पुन्हा प्रज्ञासिंह यांनी बाबरी मशिदीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.